Site icon

भीमा कोरेगाव खरा इतिहास


कोरेगाव भीमा येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येतात.
कोरेगाव भीमा येथील इतिहास नक्की काय आहे.
लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे असलेल्या विजयस्तंभ ला मानवंदना देण्यासाठी का एकत्र येतात असा प्रश्न सर्वांनाच पडत असेल.
चला तर पाहूया कोरेगाव भीमा येथील इतिहास नक्की काय आहे
कोरेगाव भीमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती.
ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता.
इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता.
दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना, अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले, जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते. पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे २,००० सैनिक पाठवले. कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ १२ तास लढाई केली आणि ही लढाई दुसऱ्या दिवशी १० वाजता संपली. मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली.
ही लढाई इंग्रज-मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली.
पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार बांधवांना,अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. १८०० च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते, त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती.
कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या ४९ सैनिकांची नावे कोरली.यामध्ये २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.
महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार बंधू), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.
जेम्स ग्रांट डफ यांनी आपल्या ‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज’ या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केला आहे. रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य भीमेच्या किनाऱ्यावर पोहोचलं.
तिथे त्यांनी 25 हजार मराठ्यांना रोखलं. ते नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिले. ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्याला वाटत होतं. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं वाटेतल्या गावावर कब्जा केला आणि त्याचं रुपांतर गढीत केलं.
हेन्री टी प्रिंसेप यांनी ‘हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया’ या पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचं वर्णन या पुस्तकात आहे.
कॅप्टन स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याची तुकडी पुण्याच्या दिशेनं जात असताना त्यांच्यावर आक्रमणाची शक्यता होती. उघड्या मैदानात सैन्य अडचणीत सापडू नये यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं कोरेगावला आपला बालेकिल्ला म्हणून तयार केलं. मोकळ्या ठिकाणी सैन्य राहिलं असतं तर मराठ्यांकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं असतं.
जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी 1जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.दरवर्षी मोठ्या उत्साहाने अनुयायी या विजस्थंभाला अभिवादनासाठी येत असतात.
अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.

Exit mobile version